

|| श्री ||
आळंदी येथे संपन्न झालेल्या युवा साधक-शिबिराचा वृत्तांत

संक्षिप्त चलतचित्र
शनिवार आणि रविवार, दिनांक ७ व ८ जून २०२५, असे दोन दिवस आळंदी येथील आपल्या संस्थेच्या प्रकल्पस्थानी ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय’ येथे युवा साधक-शिबिर मोठ्या उत्साहाने व अतिशय नियोजनबद्धरित्या संपन्न झाले. नवीन साधकांना आपल्या संप्रदायाचा परिचय व्हावा, साधक बंधुभगिनींची आपापसात ओळख व्हावी, विशुद्ध परमार्थ तसेच साधना म्हणजे काय व त्याचे अनन्यसाधारण महत्त्व काय आहे, हे त्यांच्या लक्षात यावे ही भूमिका ठेवून ‘श्रीपाद सेवा मंडळ’ आणि ‘श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन व श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ प्रकल्प’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभ्यास-शिबिर आयोजित करण्यात आले होते.
मंडळाच्या विविध केंद्रांमधून अनेक युवा साधक या शिबिरासाठी एकत्र जमले होते. शिबिराची सुरुवात शनिवारी सकाळी ठीक ७.०० वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या पावन उपस्थितीत सामुदायिक साधनेने झाली. अल्पोपाहार व चहापानानंतर सकाळी ९.०० वाजता शिबिराच्या प्रथम सत्रास प्रारंभ झाला. त्या वेळी सर्व उपस्थित साधकांनी आपला परिचय करून दिला. त्यानंतर श्री.पार्थ संदीप आगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा यांनी प्रस्तुत शिबिराचा हेतू आणि अपेक्षित उद्देश काय आहे याविषयी प्रस्तावना करून प्रथम सत्राची सुरुवात केली. ‘संप्रदाय म्हणजे काय ?’ ‘शक्तिपात कसा होतो ?’ तसेच ‘प.पू.सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराज यांच्या ठिकाणी श्रीदत्त संप्रदाय, श्रीनाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदाय यांचा अनोखा त्रिवेणी संगम कसा आहे ?’ याबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. अतिशय गूढ, कालौघात लुप्त होत चाललेले शक्तिपात दीक्षेचे सर्व बाहत्तर प्रकार प.पू.सद्गुरु श्री.मामांना ज्ञात होते, याचा उल्लेख प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी या वेळी आवर्जून केला. संप्रदायकार्याच्या विस्तारासाठी स्थापन केलेल्या ‘श्रीपाद सेवा मंडळ’ या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे नमूद करताना प.पू.श्री.अनिरुद्धदादा म्हणाले की, ‘‘विशुद्ध परमार्थ तसेच वैदिक तत्त्वज्ञान यांचा प्रसार करणे आणि माणुसकी, समता, एकता व विश्र्वबंधुत्व या तत्त्वांचा अवलंब करणारे साधक तयार करणे, निकोप वृत्तीचा समाज टिकवून ठेवणे ही ‘श्रीपाद सेवा मंडळा’ची काही प्रमुख उद्दिष्टे आहेत. येथे उल्लेखिलेली तत्त्वे हा परमार्थमार्गाचा पाया असल्याने त्यांचा समावेश संस्थेच्या घटनापत्रकात करण्यात आलेला आहे. म्हणून सर्व साधकांनी या तत्त्वांचे आवर्जून पालन करावे !’’
छोट्या विश्रांतीनंतर दुसऱ्या सत्रात मंडळाच्या आणखी काही उद्दिष्टांचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी ‘साधक’ म्हणून ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या उद्दिष्टांना अनुसरून आपली वागणूक कशी असावी, याविषयी मार्गदर्शन केले. साधकांचा आहार-विहार हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपण सेवन करत असलेल्या अन्नाने आपले मन तर पाण्याने आपले प्राण बनतात. म्हणून आपल्या आहाराचा आपल्या मनाशी आणि प्राणांशी थेट संबंध असतो. सतत घराबाहेरील, हॉटेलमधील अन्न किंवा परान्न सेवन करणे, फोटो वगैरे पोस्ट करून अन्नपदार्थांचे प्रदर्शन करणे, Social Media वरून अन्नपदार्थांचे सार्वजनिकीकरण करणे या सर्वांचा प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी तीव्र निषेध केला. असे केल्याने होणारे दुष्परिणामही त्यांनी स्पष्ट करून सांगितले.
आपल्या परंपरेतील सर्वच सद्गुरुमहात्म्यांनी अविरतपणे अपार कष्ट घेऊन अत्यंत मोठे असे जे संप्रदायकार्य कसे उभे केले आहे, त्याबद्दलही प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी नेमकेपणाने सांगितले. प.पू.सद्गुरु सौ.ताईंनी प्रपंच, नोकरी, घरातील लहान-थोर सर्वांच्या बाबतीतील आपल्या जबाबदाऱ्या तर काटेकोरपणे निभावल्याच पण त्याबरोबरीनेच परमार्थ, परंपरेचे कार्य आणि सद्गुरुसेवा हे सर्वच आदर्शवत् संपन्न केले, हेही त्यांनी त्यांच्या काही आठवणींतून सांगितले. ‘‘साधकांना केवळ आपला परमार्थच साधायचा असतो, मात्र त्यातही सतत प्रापंचिक प्रश्नांची ढाल पुढे केल्यास पारमार्थिक प्रगती होणार नाही’’, असे ते म्हणाले.
दुसऱ्या सत्रानंतर भोजन व विश्रांतीनंतर दुपारी ठीक ३:०० वाजता तिसऱ्या सत्रास सुरुवात झाली. या सत्रात ‘साधक म्हणजे काय ?’ व ‘साधकांची कर्तव्ये कोणती ?’ या विषयी मार्गदर्शन करताना प.पू.श्री. अनिरुद्धदादांनी सांगितले की, ‘‘साधकांकडे संप्रदायाशी, परंपरेशी निगडित व्यक्ती म्हणून पाहिले जाते. म्हणून त्यानुसार योग्य असेच वर्तन ठेवणे हे सर्व साधकांचे कर्तव्य आहे !’’ साधकांचा परमार्थ सद्गुरुसेवेशिवाय पूर्ण होत नाही. कालगतीप्रमाणे सद्गुरुसान्निध्याचा लाभ मिळणे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा सद्गुरुदर्शन व सद्गुरुसेवा आवर्जून करावी. सद्गुरुसेवेबरोबरच भगवत्सेवा, भूसेवा, गोसेवा आणि आईवडिलांची सेवा करणे हे देखील साधकांचे कर्तव्य आहे !’’
त्यानंतर प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या सर्व प्रकल्पस्थानांची सविस्तर माहिती सांगितली. ‘‘ ‘माउली’ हे मुख्यालय व ‘श्रीवामनराज प्रकाशना’चे कार्यालय असणारी ‘श्रीपाद निवास’ वास्तू ही दोन प्रमुख स्थाने सिंहगड रस्ता, आनंदनगर पुणे येथे आहेत. तसेच श्रीक्षेत्र दत्तधाम, हेळवाक येथील ‘भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे मंदिर’, श्रीक्षेत्र आंबेरी येथील ‘प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन व भगवान श्रीकृष्ण मंदिर’ आणि श्रीक्षेत्र जळगांव जामोद येथील ‘श्रीदत्त मंदिर’ हे तीन प्रकल्प प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराजांच्याच संकल्पाने साकार झालेले आहेत. या सर्वच प्रकल्पांवर श्रीभगवंतांचे प्रकट अधिष्ठान असल्याने तेथे येणाऱ्या प्रत्येकास अपार शांती-समाधानाचा अनुभव निश्र्चितच येतो’’, असे प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी नमूद केले.
चहापानाच्या विश्रांतीनंतर शिबिराच्या पहिल्या दिवसातील शेवटच्या सत्रास सुरुवात झाली. या सत्रात प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी ‘श्रीवामनराज प्रकाशन’, त्याची पार्श्र्वभूमी, उद्देश आणि आपल्या या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या विपुल ग्रंथसंपदेचा थोडक्यात परिचय करून दिला. ओवीबद्ध ग्रंथ, स्फुट लेख, श्री ज्ञानेश्र्वरीवरील प्रवचने, संतांच्या अभंगांची निरूपणे, संप्रदायाचे तत्त्वज्ञान समजण्यास आवश्यक अशा संस्कृत ग्रंथांची सुलभ मराठी रूपांतरे अशा विविध विषयांवरील समृद्ध वाङ्मयनिर्मिती ही केवळ साधकांच्या कल्याणाकरिताच केली गेली आहे. म्हणूनच व्यर्थ प्रपंचविषयांत रमण्याऐवजी, मोबाईलचा अतिरिक्त वापर करण्याऐवजी साधकांनी दररोज या ग्रंथांचे किमान एक पान तरी वाचन करावे, अशी सूचना प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी केली. परमार्थ हा ‘योगा’च्या आणि ‘बोधा’च्याही अंगाने होणे अपेक्षित आहे; म्हणूनच आपल्या नित्याच्या साधनेस आपल्या प्रकाशनाच्या ग्रंथांच्या अभ्यासाची, वाचन-मननाची जोड दिल्यास साधकांची निश्चितच प्रगती होईल, असे त्यांनी सांगितले.
चौथ्या सत्रानंतर उपस्थित सर्व साधक बंधुभगिनींनी ‘श्रीस्वामी समर्थ नामपाठा’चे सामुदायिक पठण केले. तसेच ‘श्रीकृष्णाष्टकम्’, ‘श्रीगोविंदाष्टकम्’ व ‘श्रीदत्तभावांजली’ आदी स्तोत्रांचेही या वेळी सामुदायिक पठण करण्यात आले व त्यानंतर देवांची आरती व मंत्रपुष्प संपन्न झाले.
भोजनोत्तर रात्री ९.४५ वाजता उपस्थित साधकांपैकी काही बंधुभगिनींनी गायनसेवा सादर केली. ‘ज्ञानियांचा राजा गुरुमहाराव’, ‘आरंभी वंदिले अयोध्येचा राजा’, ‘अमृताहूनी गोड नाम तुझे देवा’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘हरी तुझे नाम’, ‘पद्मनाभा नारायणा’, ‘नंद मुकुंद मुरारी सावळा’, ‘नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला’, ‘पायोजी मैंने राम रतन धन पायो’ अशा त्यांनी गायिलेल्या एकाहून एक सुश्राव्य अभंगांना साधकांपैकी वादक-कलाकारांनीही संवादिनी, तबला आणि टाळाची सुंदर साथ केली. अभंग गायन-सेवेचा शेवट ‘हेचि दान देगा देवा’ या अभंगाने झाला व त्याबरोबर पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमांची समाप्ती झाली.
शिबिराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही सकाळी ७.०० वाजता सामुदायिक साधनेने झाली. अल्पोपाहारानंतर ठीक ९.०० वाजता पाचव्या सत्रास प्रारंभ झाला. प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी ‘श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन ज्ञानयोग अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान, आळंदी (देवाची)’ या संस्थेचा इतिहास, प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज यांची हे कार्य उभे करण्यामागील भूमिका, संस्थेचे उपक्रम व उद्दिष्टे यांचा सर्वांना परिचय करून दिला.
त्या वेळी प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी सांगितले की; ‘‘श्री ज्ञानेश्वरीतील ज्ञानाचा जनसामान्यांसाठी सुबोध रूपाने प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प.पू.सद्गुरु श्री.मामांनी या संस्थेची स्थापना केली आहे. श्री ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात नमूद केल्याप्रमाणे सद्गुरु श्री माउलींना अपेक्षित असणारे, जेथे भगवंतांचे अधिष्ठान असेल, अधिकारी व सिद्ध महात्म्यांचा सहवास लाभेल असे शांत व पवित्र ‘तपोवन’ अध्यात्म व तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून देणे हाच विशुद्ध हेतू या संस्थेच्या निर्मितीमागे आहे. कारण अशा वातावरणात घडलेला अभ्यास हा आत्मोद्धारास कारण ठरतो. यासाठी परमार्थाविषयी मनापासून तळमळ हवी !’’
याच संस्थेअंतर्गत असणाऱ्या ‘श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ’ व ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय’ या दोन प्रमुख प्रकल्पांविषयीही प.पू.श्री. अनिरुद्धदादांनी सविस्तर माहिती सांगितली. लुप्त होत चाललेल्या आपल्या प्राचीन शास्त्र-शाखांचा अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आवश्यक असे त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींद्वारे मार्गदर्शनपर व्याख्यानवर्ग चालवणे हा ‘श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठा’चा मूळ उद्देश आहे. तसेच दुर्मिळ ग्रंथांचे संवर्धन, शास्त्रग्रंथांतून निवडक असे उत्तम आध्यात्मिक ज्ञान जिज्ञासूंना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालया’ची उभारणी करण्यात आलेली आहे. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन, या ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांचे Digitisation चे अतिशय महत्त्वाचे कामही या ग्रंथालयात सुरू आहे.
‘‘आपल्या सद्गुरूंनी पराकोटीचे कष्ट घेऊन या दोन्ही संस्था आणि त्याअंतर्गत विविध प्रकल्प उभे केले आहेत. तसेच त्यांनी जिवापाड मेहनतीने विशुद्ध परमार्थासाठी लागणारी सर्व साधने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत. दुर्दैवाने आपण मात्र त्यांचा लाभ घेण्यात कमी पडत आहोत’’, असे प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी कळकळीने सांगितले. या वेळी उपस्थित असणारे ज्येष्ठ साधक श्री.वसंत पाटणकर काका यांनी ‘श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन संस्थे’च्या निर्मितीपूर्वीचा प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराजांच्या जीवनातील अत्यंत हेलावून टाकणारा एक प्रसंग सांगितला. केवळ भक्तकल्याणाच्या तळमळीतून प.पू.श्री.मामांनी घेतलेले अविरत कष्ट आणि श्रीभगवंतांनी त्यांना दिलेली साथ याचे ते हृदय हेलावून टाकणारे वर्णन ऐकून सर्वच उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आले. खरेच प.पू.सद्गुरु श्री.मामांनी साधकांवर केलेले उपकार हे त्यांचे आपल्यावरील कधीही न फिटणारे ऋण आहे याचाच पुनःप्रत्यय सर्वांस आला.
थोड्याशा विश्रांतीनंतर अखेरच्या सत्रास सुरुवात झाली. त्या वेळी प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी ‘श्रीपाद सेवा मंडळा’शी संलग्न असणाऱ्या इतर संस्थांविषयी माहिती सांगितली. ‘‘ ‘संस्कृती संवर्धिनी फाऊंडेशन, चिपळूण’ या संस्थेअंतर्गत चिपळूण येथे स्थापित ‘श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठ’, सध्या बांधकाम सुरू असणारे तेथील ‘श्रीदत्तमंदिर’ व ‘अमृतबोध’ हे मासिक या सर्वांचा उद्देश हा आपल्या मंडळास समांतरच आहे’’, हे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर वर्धा येथील ‘श्रीकृष्णधाम’ व ‘श्रीदत्तमंदिर’ हे प्रकल्पही ‘श्रीपाद सेवा मंडळा’शी संलग्न असल्याचे सांगून, त्यांचीही त्यांनी थोडक्यात माहिती सांगितली.
त्यानंतर प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी यापूर्वी नमूद केलेल्या ‘सेवा’ या विषयासंबंधी अधिक विस्ताराने चर्चा केली. या वेळी त्यांनी सांगितले की, ‘‘सेवा ही निःस्वार्थपणे तनाने आणि मनाने झाली पाहिजे. शारीरिक कष्ट केल्याने अहंकार कमी होतो. तसेच मनाचे चोचले न पुरवता त्याच्या विरुद्ध जाऊन सेवा करावी लागते. सद्यकालात देहाच्या माध्यमातून प्रत्यक्ष सद्गुरुसेवा करता येणे दुर्लभ आहे, म्हणूनच आपल्याला आपल्या संस्थेच्या प्रकल्पांच्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याची संधी देण्यात येते. परंपरेच्या उत्सवप्रसंगी केली जाणारी सेवा तसेच सद्गुरुस्थानांची सेवा ही सद्गुरुसेवेचेच फळ देणारी असते. परिपूर्ण परमार्थ साधण्यासाठी सर्व साधकजनांनी अशी सद्गुरुसेवा अवश्य करावी !’’ असे प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी पुन्हा नमूद केले.
या वेळी त्यांनी सर्व उपस्थित साधकांना कळकळीने सांगितले की, ‘‘आपल्या सद्गुरुपरंपरेने अपार कष्ट करून केवळ आपल्या कल्याणाकरिताच, आपला विशुद्ध परमार्थ घडावा म्हणून हे अजोड कार्य उभे केले आहे. भविष्यातही संस्थेमार्फत या कार्याचा प्रचार व प्रसार होतच राहील. साधकांनी माणुसकी, एकता, समता व बंधुता या मूल्यांचे स्वतःच्या ठिकाणी संवर्धन करावे आणि नेमाने व प्रेमाने साधना करीत राहावे. त्याचबरोबरीने संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास व त्यास सद्गुरुसेवेची जोड देऊन परमार्थमार्गावर अग्रेसर राहावे !’’.
या प्रकल्पस्थानी पूर्ण वेळ सेवेस असणारे ज्येष्ठ साधक श्री.जयंत साठे काका यांनी शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रकल्पस्थानांवरील सेवांचा साधकांनी अवश्य लाभ घ्यावा, याचा पुनरुच्चार केला.
शिबिरादरम्यान प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी सध्या होत असलेला मोबाईलचा व सोशल मिडियाचा अतिरिक्त व अनावश्यक वापर, OTT माध्यमांवरील वायफळ विषयांचा आस्वाद घेऊन वेळ व्यर्थ घालवणे, वृद्ध मातापित्यांची होणारी हेळसांड यावर परखड शब्दांत भाष्य केले. तसेच या सर्वांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचीही सर्व साधकांना जाणीव करून दिली.
प्रत्येक सत्रानंतर प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी शंका-समाधानासाठी राखीव वेळ ठेवला होता. त्या वेळी साधकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी विषयानुरूप नेमकी व समाधानकारक उत्तरे दिली. दोन दिवसांतील सर्व सत्रांमधून विस्ताराने सांगितलेल्या विविध महत्त्वाच्या मुद्यांचा थोडक्यात आढावा घेऊन प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांनी शिबिराचा समारोप केला.
संपूर्ण शिबिराचे आयोजन प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या मार्गदर्शनानुसार अत्यंत चोख आणि काटेकोरपणे करण्यात आले होते. आळंदी ग्रंथालय परिसर नेहमीप्रमाणेच अतिशय स्वच्छ होता. शिबिरस्थानीही सुंदर पुष्पसजावट करण्यात आली होती. दोन्ही दिवस तळमजल्यावरील कार्यालयात ‘अमृतबोध’ आणि ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या स्टॉल्सवर विक्रीकरिता ‘श्रीवामनराज प्रकाशना’चे ग्रंथ उपलब्ध होते. अनेक साधकांनी त्यांचा लाभ घेतला.
अत्यंत शिस्तबद्धरित्या संपन्न झालेले हे शिबिर सर्वच उपस्थितांना अंतर्मुख करविणारे आणि त्याचबरोबर परमार्थमार्ग अधिक प्रशस्त होण्यास साह्य करणारे ठरले. आपल्या महान सद्गुरुपरंपरेच्या कार्याचा पाईक होण्याचा, नित्यनियमाने सद्गुरुसेवा करण्याचा आणि देहाची तीन चिमट्या राख होईस्तोवर साधना करण्याचा निश्चय मनोमन करीत शिबिरातील सर्व साधक मंडळी आपापल्या स्थानी परतली.
शिबिरातील काही क्षण चित्रे















