
॥ श्री ॥
चिपळूण येथे संपन्न झालेल्या भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीशैल्यगमन महोत्सवाचा वृत्तांत
दिनांक २ फेब्रुवारी २०२६ अर्थात् माघ कृ.प्रतिपदा या दिवशी चिपळूण येथील ‘लक्ष्मीबाई माटे सभागृहा’त भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा श्रीशैल्यगमन महोत्सव अतिशय श्रद्धापूर्ण वातावरणात संपन्न झाला.
संक्षिप्त चलतचित्र
सभागृहाच्या व्यासपीठावर फुलांची आकर्षक सजावट करून तेथे श्रीसद्गुरुपरंपरा, भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज व प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे महाराज यांच्या प्रतिमा प्रतिष्ठापित केल्या होत्या.
सकाळी प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराजांच्या पादुकांची षोडशोपचारे पूजा करण्यात आली. तदनंतर साडेसात ते साडेआठ या वेळेत प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत सामुदायिक साधना संपन्न झाली. अल्पोपाहारानंतर ‘श्रीदत्तभावांजली’ स्तोत्राचे सामुदायिक पठण करण्यात आले. ठीक साडेनऊ वाजता प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादांचे सभागृहात आगमन झाले. ‘श्रीदत्तभावंजली’ स्तोत्र- पठणानंतर चिपळूणचे प्रसिद्ध गायक श्री.राजाभाऊ शेंबेकर यांनी श्रीसद्गुरुचरणीं गायनसेवा रुजू केली. ‘नमन माझे गजवदना’ या अभंगाने त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘आरंभी वंदीन अयोध्येचा राजा’ हा अभंग सादर केला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या गायनसत्राची सांगता त्यांनी ‘झाडी चरणधूल मस्तकी आता’ ह्या प.पू.श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या रचनेने केली. श्री. राजाभाऊ शेंबेकर यांना संवादिनीची अतिशय सुंदर साथ श्री.अमित ओक यांनी तर तबल्याची साथ श्री.सुश्रुत चितळे यांनी केली. तसेच श्री.सुयोग केळकर यांनी तालवाद्याची साथ केली. श्रीसद्गुरुचरणीं सेवा रुजू करणाऱ्या या सर्व कलाकारांना प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा यांच्या पावन हस्ते मानधन व प्रसाद देण्यात आला.
या कार्यक्रमानंतर प.पू.श्री.अनिरुद्धदादांची प्रवचन-सेवा संपन्न झाली.
ही श्री ज्ञानेश्वरीतील ओवी त्यांनी सेवेला घेतली होती. पाचव्या अध्यायातील या ओवीची भूमिका स्पष्ट करताना प.पू. श्री दादांनी सांगितले की, भगवंत अर्जुनाला येथे मोक्षाबद्दल सांगत आहेत. सहावा अध्याय हा अभ्यासयोगाचे विवरण असून त्यात शक्तिपाताचे रहस्य सांगितले आहे. शक्तिपाताचे नियम स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, जो मनाने चंचल आहे त्याच्यावर अनुग्रह करू नये. तसेच शिष्याने स्वतः विचारल्याशिवाय श्रीसद्गुरूंनी अनुग्रह करू नये. हा अनुग्रह श्रीभगवंतांच्या संकल्पानेच होऊ शकतो, असे प.पू. श्री दादांनी सांगितले.
‘निश्चय आणि विश्वास’ याबद्दल सांगताना प.पू. श्री दादांनी श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र उदाहरण म्हणून सांगितले. साधक म्हणून आपण आपल्या श्रीसद्गुरूंनी दाखवून दिलेल्या मार्गानेच चालावे आणि तसा ठाम निश्चय ठेवावा. ओवीचे पुढे विवरण करताना प.पू. श्री दादांनी सांगितले की, जिथे अखंड प्रेम आणि आनंदाची अनुभूती येते, तोच ‘महासुखाचा निमथा’ होय. ज्याला श्रीसद्गुरूंकडून अनुग्रह प्राप्त झाला आहे आणि जो त्यांच्या सांगण्यानुसार साधना करतो, त्यांपैकी एखादा ‘महासुखाचा निमथा | वहिला पावे’ असा अनुभव प्राप्त करतो. ‘पावे’ या शब्दाचे स्पष्टीकरण करताना प.पू. श्री दादांनी सांगितले की, करुणामय भगवती शक्ती साधकाला मोक्षपर्वत चढवून त्या निमथ्यावर नेते.
‘जो’ या शब्दाबद्दल सांगताना प.पू. श्री दादांनी स्पष्ट केले की, अनेक पंथांमध्ये ‘जो’ पंथ मोक्षपर्वतावर नेतो, तोच खरा पंथ होय. ज्या पंथात सगुण आणि निर्गुण या दोन्हींची प्राप्ती होते, तोच युक्तीपंथ. साधकांसाठी ‘अनन्यभावे शरणागती’, ‘नियमित साधना’ आणि ‘श्रीसद्गुरुसेवा’ या तीन युक्त्या आहेत, असे प.पू. श्री दादांनी सांगितले.
या प्रवचन-सेवेनंतर ‘श्रीगुरुचरित्रा’तील श्रीशैल्यगमन कथेच्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर नामजप व आरती-मंत्रपुष्प होऊन पुण्यकाल साजरा करण्यात आला. अवीट गोडीच्या महाप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली. पुणे, मुंबई, गोवा, कऱ्हाड, कोल्हापूर इत्यादी विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने उपस्थित राहून साधक बंधुभगिनींनी कार्यक्रमाचा व श्रीसद्गुरुदर्शनाचा लाभ घेतला.
या उत्सवानिमित्त चिपळूणला आलेल्या अनेक साधक-बंधुभगिनींनी ‘श्री अक्कलकोटस्वामी समर्थ मठा’तही राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
उत्सवातील काही क्षण चित्रे

