
॥ श्री ॥
श्रीक्षेत्र दत्तधाम येथे संपन्न झालेल्या श्रीगुरुद्वादशी महोत्सवाचा वृत्तांत
शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ अर्थात् आश्विन कृष्ण द्वादशी श्रीशके १९४७ या दिवशी, भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या निजानंदगमनाचा उत्सव श्रीक्षेत्र दत्तधाम येथे भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सकाळच्या सत्रामध्ये मंदिरात रुद्र, पुरुषसूक्त, श्रीसूक्त आणि अथर्वशीर्ष यांच्या एकदष्ण्या संपन्न झाल्या. या वेळी इतर काही सूक्तांचा देखील अभिषेक करण्यात आला. श्रीगुरुद्वादशी उत्सवाच्या निमित्ताने मंदिर संपूर्ण दिवस भाविकांना दर्शनासाठी खुले होते. मुंबई, पुणे, सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर, चिपळूण अशा विविध गावांतील अनेक साधक-सद्भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. गडावरील ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या तसेच ‘अमृतबोध’ मासिकाच्या स्टॉललाही त्यांनी आवर्जून भेट दिली व त्यांचा लाभ घेतला.
संध्याकाळी ठीक साडे पाच वाजता ‘श्रीदत्तभावांजली’ स्तोत्राचे सामुदायिक पठण करण्यात आले. त्यानंतर ‘श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि’, ‘कृष्णातीरिंच्या वसणाऱ्या’, ‘भीमा अमरजा संगमातीरी’, ‘त्रैलोक्याचा राजा’ असे विविध भक्तिरसपूर्ण अभंगांचे गायन झाले. त्यानंतर ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या महामंत्राच्या जपाने वातावरण भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण झाले. तदनंतर आरती, मंत्रपुष्पांजली व करुणात्रिपदी झाली. त्यानंतर साधकांनी मंदिराभोवतीच्या प्रांगणात, नामसमाधी मंदिराच्या सभोवती तसेच श्रीगुरु-पादुका मंदिराजवळ आणि श्री मारुतिरायांच्या मंदिराजवळ पणत्यांची मांडणी केली.
आरती संपन्न झाल्यानंतर परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्धदादांनी त्रिपुरावरील पणती प्रज्वलित करून दीपोत्सवाचा शुभारंभ केला. त्यानंतर साधक-बंधुभगिनींनी सर्व पणत्या लावल्या आणि संपूर्ण परिसर दिव्यांच्या तेजाने उजळून निघाला. सर्व उपस्थित साधक-सद्भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने श्रीभगवंतांचे दर्शन घेतले आणि तीर्थ-प्रसाद घेऊन समाधानाने सर्वजण आपापल्या स्थानी परतले.
