
|| श्री ||
नमो सद्गुरो ज्ञान-स्वानंदराशी
नमो आत्मलिंगा इये देहकाशी ।
जया वंदिता मुक्ती पायांसी लोळे
स्वये हर्षुनी भक्ति-उत्साह मेळे ।।
श्रीव्यासपौर्णिमेचा महोत्सव का साजरा करावा? हेही प.पू.सद्गुरु श्री. दादांनी वेळोवेळी विस्ताराने सांगितले आहेच. ‘हरिनामसंकीर्तन; प्रक्रिया आणि सामर्थ्य’, या ग्रंथाच्या पृ.क्र.१०३ वर प.पू.श्री.दादा असे म्हणतात की, ‘‘श्रीगुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा साधनेला बसतो, त्या वेळेस प्रत्यक्ष सद्गुरु-परंपराच आपले साधन बघत असते. त्या दिवशी वर्षभरात साधकाने काय केले ते जोखले जाते आणि त्याला साधनापथावर पुढे कसे न्यायचे तेही ठरवले जाते. म्हणूनच वर्षभर नियमाने साधना करणे आणि त्या साधनेची परीक्षा श्रीगुरुपौर्णिमेला देणे हे साधकाचे कर्तव्य असते. त्या अनुषंगानेही श्रीगुरुपौर्णिमेचा, श्रीव्यासपौर्णिमेचा हा उत्सव अत्यंत महत्त्वाचा असतो !’’
‘अभ्यासयोगा’तील मर्मस्थळे; खण्ड २’, या ग्रंथातील पृ.क्र.६० वर प.पू.श्री.दादा म्हणतात की, ‘‘या महोत्सवानिमित्त आपण साधनेचे स्मरण तसेच सद्गुरुपरंपरेच्या प्रेमबोधाचे अनुसरण करण्यासाठीच एकत्र जमलेलो असतो !’’
त्यामुळे या मंगलदिनी प.पू.सद्गुरु श्री.दादांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘‘श्रीसद्गुरूंच्या कृपेने आमचे साधन सुफल संपूर्ण होवो. आमची मती आणि कृती अखंड साधनेचीच राहो. आमच्या हृदयामध्ये आपल्या श्रीचरणांबद्दल वाढते प्रेम राहो आणि ते नित्य सुमंगल-पडिभराला येवो !’’ (‘अभ्यासयोगा’तील मर्मस्थळे; भाग २, पृ.क्र.६०) अशी प्रार्थना करण्यासाठीच विविध केंद्रांच्या उत्सवांना सर्व साधक एकत्र जमले होते.
संक्षिप्त चलतचित्र
महोत्सव स्थळ
प्रतिवर्षीप्रमाणे आषाढ पौर्णिमेच्या; श्रीव्यासपौर्णिमेच्या दिवशी, दिनांक १० जुलै २०२५ रोजी श्रीगुरुपौर्णिमेचा महोत्सव ‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या पुणे केंद्रात अत्यंत आनंदाने व उत्साहाने संपन्न झाला. सुगंधी फुलांच्या आकर्षक सजावटीने व रांगोळ्यांनी सुशोभित अशा ‘माउली’ आश्रमात प्रातःकाली ७ ते ९.३० या वेळेत श्री.चिन्मय व सौ.प्रदीप्ती सरपटवार यांच्या हस्ते श्रीसत्यदत्त पूजा आणि श्री.पीयूष व सौ.अनघा खपली यांच्या हस्ते श्रीसद्गुरुपादुका-पूजन करण्यात आले. सकाळी ७ ते ८ या वेळेत ‘श्रीपाद निवास’ येथे सामुदायिक साधना संपन्न झाली. त्यासाठी मोठ्या संख्येने साधक बंधुभगिनी उपस्थित होते.
सकाळी प्रथम प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांनी ‘माउली’त देवांचे आणि श्रीसद्गुरूंचे दर्शन घेतले आणि त्यानंतर लगेचच सद्गुरु-दर्शनाच्या प्रथम सत्रास सुरुवात झाली. आश्रमात दिवसभर साधक-सद्भक्तांची सद्गुरूंचे दर्शन घेण्यासाठी रीघ लागली होती. सकाळी ८.३० ते १२.३० आणि सायंकाळी ४ ते ६.३० अशा दोन सत्रांत भक्तजनांनी मोठ्या संख्येने श्रीसद्गुरुदर्शनाचा लाभ घेतला. या विशेष पर्वणीनिमित्त ‘माउली’ आणि ‘श्रीपाद निवास’ ही दोन्ही मंदिरे भक्तजनांना दर्शन घेण्यासाठी पूर्णवेळ उघडी ठेवण्यात आली होती.
‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या, ‘अमृतबोध’ मासिकाच्या आणि श्रीक्षेत्र आंबेरी येथील सेंद्रिय उत्पादनांच्या स्टॉल्सनाही या वेळी अभ्यागतांनी भरघोस प्रतिसाद दिला.
सायंकाळी सात वाजल्यापासून प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराज आणि प.पू.सद्गुरु मातुःश्री सौ.ताई यांच्या पादुकांची राजोपचार महापूजा श्री.पार्थ आगटे यांच्या हस्ते संपन्न झाली. या वेळी षोडशोपचार पूजा-अभिषेकानंतर काही साधकबंधूंनी विविध संतरचना गाऊन सुरेल अलंकार-सेवा सादर केली. तत्पश्चात गर्भगृहात उपस्थित असणाऱ्या वेदमूर्ती ब्रह्मवृंदाने चारी वेद, शास्त्र, पुराण व पंचांग इत्यादी सेवा श्रीसद्गुरुचरणीं रुजू केल्या. तसेच या प्रसंगी कु.अक्षता पंडित यांनी नृत्य, श्री.पार्थ आगटे व श्री.यश रुईकर यांनी गायन, श्री.विजय उपाध्ये, श्री.मनोज भांडवलकर व श्री.चैतन्य देशपांडे यांनी वाद्यवादन, श्री. चिन्मय देशपांडे यांनी चामर आणि काही साधक बंधूंनी नामजप अशा विविध सेवा अत्यंत आदराने व प्रेमभावे श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केल्या. तदनंतर प.पू.सद्गुरु श्री. मामांचा नामगजर करण्यात आला. राजोपचार पूजा संपन्न झाल्यानंतर श्री. पार्थ आगटे यांना वेदमूर्ती श्री.दत्तात्रेयशास्त्री जोशी गुरुजींनी स्वस्तिआशीर्वचन व श्रीसद्गुरूंचा प्रसाद दिला. तसेच श्री.पार्थ आगटे यांच्या हस्ते वस्त्रे व दक्षिणा देऊन सर्व ब्रह्मवृंदाची यथोचित संभावना करण्यात आली. तदनंतर सर्व उपस्थितांनी मनोभावे श्रीसद्गुरुदर्शन घेतले आणि तीर्थप्रसादाने महोत्सवाची मंगलमय सांगता झाली.
श्रीगुरुपौर्णिमेचा हा महोत्सव रविवार दिनांक १३ जुलै रोजी, दादर येथील ‘सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज सभागृहा’त अत्यंत उत्साहाने व आनंदाने साजरा झाला.
आदल्या दिवशीपासूनच तरुण उत्साही स्वयंसेवकांनी हॉलची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यास सुरुवात केली होती. ताज्या सुगंधी फुलांच्या माळा, विविधरंगी फुलांचे सुंदर हार, कृत्रिम फुलांची सजावट यांनी हॉलची शोभा अधिकच खुलली होती. व्यासपीठावरील अनंतकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, श्रीसद्गुरुपरंपरा, भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री.मामा महाराज व भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातुःश्री सौ.ताई महाराज यांच्या देखण्या प्रतिमांना अतिशय सुंदर सुवासिक पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या होत्या.
१३ तारखेला सकाळी ९.१५ वाजता सौ.मंजिरी व श्री.शशांक लिमये यांच्या हस्ते श्रीसत्यदत्तपूजेला; तर सौ.ज्योती व श्री.पुष्कल पराशर यांच्या हस्ते प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या पादुका-पूजनास सुरुवात झाली. पूजेनंतर उपस्थित साधकांकरवी ताला-सुरात आरती करण्यात आली.
दुपारी ३ ते ४ या वेळेत सामुदायिक साधना संपन्न झाली. साधना संपत असतानाच प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचे सभागृहात मंगल आगमन झाले. त्या वेळी सायंकाळी ४.१५ ते ५.१५ या दरम्यान प.पू.श्री.दादांच्या अनुमतीने सौ.संगीता चितळे, सौ.अपर्णा देवधर आणि श्री.विजय उपाध्ये यांनी ‘अभंग-सेवा’ सादर केली. त्यांना श्री.मनोज भांडवलकर यांनी पखवाजाची, श्री.मंदार जाधव यांनी तबल्याची तर श्री.अथर्व चांदोरकर यांनी टाळांची सुंदर साथ केली.
प्रथम सतार, संवादिनी व पखवाज-तबला-टाळ या ताल-वाद्यांच्या साथीने ‘जय जय राम कृष्ण हरि’ हा जप गाऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी सौ.संगीता चितळे यांनी भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींचे, ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ आणि ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ हे दोन अभंग; श्रीसंत जनाबाई महाराजांचा ‘आळवितां धाव घाली । ऐसी प्रेमाची भुकेली ।।’ हा अभंग; श्रीसंत मीराबाई महाराजांची ‘हो म्हाराँ बाला गिरीधारी । थाने काई के समझाऊँ ।’ ही रचना, श्रीसंत तुकाराम महाराजांचा ‘आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंदचि अंग आनंदाचें ।।’ हा अभंग आणि ‘चरण गहुँ तेरे हे गिरिधारी ।’ या प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या रचनेला देस रागात स्वरबद्ध करून तो अभंग गाऊन श्रीसद्गुरुचरणीं सेवा रुजू केली. सौ.अपर्णा देवधर यांनी सतारीवर श्रीसंत भानुदास महाराजांची ‘वृंदावनी वेणु कवणाचा माये वाजे’ ही सर्वांगसुंदर गौळण, श्रीसंत मीराबाई महाराजांची ‘पायो री मैने रामरतन धन पायो ।’ ही रचना, श्री माणिकप्रभू महाराजांचा ‘नंद मुकुंद मुरारी सावळा । गोकुळात हरि आला हो ।।’, हे अभंग अप्रतिम सादर केले. तर श्री.विजय उपाध्ये यांनी भगवान श्री माउलींची ‘घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा ।’ ही अभंगरचना संवादिनीवर बहारीने सादर केली. शेवटी, श्रीभगवंतांच्या अवीट गोडीच्या गोचारण-लीलावर्णन करणाऱ्या ‘गोधनें चाराया जातो शाङ्र्गपाणी’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. श्रोत्यांच्या डुलणाऱ्या माना, ठेका धरलेले हात आणि मुखातून नकळत बाहेर पडलेली ‘वा वा’ ही दाद त्यांच्या पसंतीची पावतीच देऊन गेली. या सर्व साधक-कलावंतांना प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या हस्ते सत्कारपूर्वक पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळाचा प्रसाद देण्यात आला.
त्यानंतर सर्वजण आतुरतेने ज्याची वाट पाहात होते त्या कार्यक्रमास म्हणजे प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या प्रवचन-सेवेस सुरुवात झाली. त्यांनी प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या ‘स्तोत्रादिसंग्रहः’ या ग्रंथातील दोनशे चौऱ्याण्णवावा अभंग सेवेकरिता घेतला होता.
विद्वानही खुळा बळी भोळा ।। १ ।।
वाग्मि मोना कान असतां भेरा जन ।
तुटोनि बंधन स्थिर राहे ।। २ ।।
अशा पाशीं देव सदां घेतो धांव ।
ठेवी जीव भाव दत्त तेथें ।। ३ ।।
ह्या कूटा जाणुनी रमे जो भजनीं ।
त्यापुढें येऊनी दत्त नाचे ।। ४ ।।
या अभंगाचे निरूपण करताना प.पू.श्री.दादांनी असे सांगितले की, ‘‘या कूट अभंगात प.प.श्रीस्वामी महाराजांनी आपली नेहमीची नाममुद्रा न वापरता ‘दत्त’ ही नाममुद्रा धारण केली आहे. कारण ते श्रीदत्तस्वरूपात मग्न असताना त्या मस्तीत त्यांच्याकडून हा अभंग लिहिला गेला. ‘श्रीदत्तमाहात्म्या’तील पंधराव्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे भगवान श्रीदत्तप्रभूंनी त्यांचा परमशिष्य राजा कार्तवीर्य अर्जुन यास षड्व्रताचा बोध केला आणि ते व्रत अनुसरून कार्तवीर्य अर्जुन त्वरित जीवनमुक्त किंवा ब्रह्मस्वरूप झाला. सांप्रतच्या काळात, प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पट्टशिष्य प.प.श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी हे व्रत आचरिले होते. सामान्य साधकाने सुद्धा हे षड्व्रत आचरण्याचा प्रयत्न केल्यास साधना-पथावर अग्रेसर होण्यास त्याचा मोठा फायदा होतो. याच षड्व्रताचे वर्णन प.प.श्रीस्वामी महाराजांनी प्रस्तुत अभंगात केलेले आहे !’’
हे षड्व्रत विस्ताराने सांगताना प.पू.सद्गुरु श्री.दादांनी त्यातील प्रत्येक व्रताचा ‘श्रीदत्तमाहात्म्या’त अभिप्रेत असलेला अर्थ आणि सामान्य साधकांसाठी अभिप्रेत असलेला अर्थ असे दोन्ही अर्थ अतिशय मार्मिकतेने उलगडून दाखवले. ‘‘ही षड्व्रते जो पाळणाऱ्याच्या वासनांची, वृत्तींची बंधने तुटून तो स्वरूपी स्थिर राहतो आणि त्याच्यापाशी देव सदा नांदतात. जो या रहस्याला, कूटाला जाणून त्याप्रमाणे आचरण करतो, भगवद्भक्तीत रमतो, त्यास सर्व सृष्टीचा मिथ्या आभास जाऊन, ही सृष्टी म्हणजे चित्शक्तीची लीलाच आहे याची अनुभूती येते. ही सृष्टी म्हणजे ‘वामांगींचा लास्यविलास’ अर्थात् श्रीशक्तीचाच लास्य-विलास आहे हे समजून येते आणि मग त्या साधकाचे अनुसंधान कधीही भंग पावत नाही !’’ असे सांगून प.पू.सद्गुरु श्री. दादांनी ही अंतर्मुख करविणारी रसाळ प्रवचन-सेवा श्रीसद्गुरुचरणीं समर्पित केली.
श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून, प्रवचनानंतर सर्व साधकांच्या वतीने मुंबई केंद्रातील ज्येष्ठ साधक श्री.जयंत साठे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ अर्पण करून प.पू.सद्गुरु श्री.दादांचे पूजन करण्यात आले. उपस्थित साधकवृंदाने स्वनामधन्य सद्गुरु श्रीसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या शब्दांचा आधार घेऊन प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या श्रीचरणीं विनवणी केली की;
पुरवावी आस गुरुराया ।। १ ।।
सर्व चराचरीं दृष्टी ऐसी करी ।
दावीं रूप हरि अखंडित ।। ३ ।।
तुज ऐसा नाही त्रिभुवनीं उदार ।
कृपे देई वर जनार्दना ।।
ए.गा.(ज.) ६.५ ।।
श्रीसद्गुरुपूजनानंतर श्रीसद्गुरुदर्शनाचा सोहळा सुरू झाला. प.पू.सद्गुरु श्री.दादांची वात्सल्यपूर्ण कृपादृष्टी व त्यांनी प्रेमाने केलेली विचारपूस यामुळे सर्वांची अंतःकरणे भरून आली होती.
‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या व ‘अमृतबोध’ मासिकाच्या स्टॉल्सना; तसेच श्रीक्षेत्र आंबेरी ‘तपोवन’ येथील सेंद्रिय उत्पादनांच्या स्टॉललाही आलेल्या साधक-भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. सद्गुरूंनी केलेला अनमोल बोध व त्यांची प्रेमळ मूर्ती मनात साठवून व तीर्थप्रसाद घेऊन सर्व साधक-सज्जन समाधानाने आपापल्या घरी परतले.
या वर्षीचा अमेरिकेतील श्रीगुरुपौर्णिमा-महोत्सव शनिवार व रविवार दिनांक १२ व १३ जुलै २०२५ असे दोन दिवस प.पू.सद्गुरु श्री. अनिरुद्धदादांच्या परममंगल उपस्थितीत डॅलस येथे सौ.आसावरी आणि श्री.श्रीहरी साठये यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साहाने संपन्न झाला. या महोत्सवासाठी अमेरिकेतील विविध शहरांमधून तसेच युरोपमधूनही आलेली साधकमंडळी उपस्थित होती.
शनिवारी दुपारी ३ वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत सामुदायिक साधनेने महोत्सवाला सुरुवात झाली. चहापानाच्या अल्प विश्रांतीनंतर सायंकाळी ठीक ५ वाजता सर्व साधक आतुरतेने वाट पाहात असलेल्या प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या प्रवचन-सेवेला सुरुवात झाली. श्री ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील एकशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकाची ओवी त्यांनी सेवेकरिता घेतली होती.

प्रस्तुत ओवीचा अर्थ विशद करून सांगताना प.पू.श्री.अनिरुद्धदादा म्हणाले की; ‘‘इथे श्रद्धा हा भाव सर्वात महत्त्वाचा आहे. या ओवीच्या प्रत्येक चरणात श्रद्धेचा संदर्भ लागू पडतो. खरे तर अनुभवी आणि ज्ञात्या सद्गुरूंकडून अनुग्रह झाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियमित साधन केले तर तो जीव ‘श्रद्धेचेनि संभोगें’; सं = परमात्मा, भोगे = अनुभवून, ‘सुखिया जाहला’ = सुखावतो; अशी त्याची स्थिती होते.
पण हा अनुभव यायला वेळ का लागतो ? खरे तर श्रद्धा ही शुद्धच असते; पण प्रकृतीमुळे, मायेमुळे ती त्रिगुणांच्या सापेक्ष सात्त्विक, राजसिक आणि तामसिक भासते आणि वासनासंस्कारामुळे ‘मनासी चाड न सांगे ।’ अशी स्थिती न होता, मनातील इच्छेमुळे म्हणजेच प्रपंचाच्या इच्छेमुळे ही श्रद्धा गुणांच्या सापेक्ष होते !’’
प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादा पुढे म्हणाले की, ‘‘या ओवीत सद्गुरु श्री माउलींनी प्रश्न आणि उत्तर हे दोन्हीही दिलेले आहे. ज्या वेळेला जीवदशा लोप पावते आणि मनात इच्छा शिल्लक राहत नाही त्या वेळेला सद्गुरुप्रदत्त साधनेने तो जीव सुखावतो. आता यासाठी सर्वांनी नियमित साधना आणि सद्गुरूंची अंतरंग व बहिरंग सेवा करायला हवी. साधना, मानसपूजा, नामजप, अभ्यास, सद्गुरुस्मरण या रूपाने अंतरंगसेवा आणि स्थूल रूपाने सद्गुरुसेवा, आपल्या प्रकल्पांवर जाऊन सद्गुरुस्थानांवर जमेल तशी शारीरिक बाह्य सेवा घडत गेल्यास श्रद्धा दृढ होत जाईल !’’
या बोधप्रद प्रवचन-सेवेनंतर साधनेशी निगडित ‘शंकासमाधान-सत्र’ संपन्न झाले. प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी अत्यंत साध्या आणि सर्वांना बोध होईल अशा सोप्या भाषेत साधकांनी विचारलेल्या शंकांचे पूर्णतः निरसन केले. सायंकाळी ७.३० वाजता नामजप होऊन आरती संपन्न झाली. त्यानंतर सर्व साधकांनी तीर्थप्रसाद ग्रहण केला आणि सर्वजण विश्रांतीसाठी आपापल्या स्थानी परतले.
दुसऱ्या दिवशीही कार्यक्रमांची सुरुवातही सकाळी ठीक ७ वाजता प.पू.सद्गुरु श्री.अनिरुद्धदादांच्या उपस्थितीत सामुदायिक साधनेने झाली. ८ ते ९ या दरम्यान अल्पोपाहार झाल्यानंतर सकाळी ठीक ९ वाजता सौ.नेहा आणि श्री.सुमित थेटे यांच्या हस्ते श्रीसद्गुरुपादुका-पूजनाला प्रारंभ झाला. श्रीसद्गुरुपरंपरेच्या तसेच प.पू.सद्गुरु श्री.मामा महाराजांच्या व प.प.सद्गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई महाराजांच्या प्रतिमांभोवती रंगीबेरंगी, सुगंधी फुलांनी केलेली आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
छान पाऊस पडून गेल्यामुळे महोत्सवातील प्रसन्न वातावरण अधिकच आल्हाददायक झाले होते. महोत्सवस्थळी सर्वत्र चैतन्यमय आनंदाची अनुभूती येत होती. उपस्थित सर्व साधकमंडळी महोत्सवातील सर्व सेवांमध्ये उत्साहाने, मनापासून सहभागी झाली होती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नामजप होऊन तदनंतर मंगल वातावरणात आरती आणि मंत्रपुष्पांजली संपन्न झाली. त्यानंतर सर्वांनी भक्तिभावाने श्रीसद्गुरुपरंपरेचे, श्रीसद्गुरुपादुकांचे आणि प.पू.श्री. अनिरुद्धदादांचे दर्शन घेतले. परमदयाळू सद्गुरूंच्या प्रेमळ कृपाकटाक्षाने आणि आपुलकीच्या शब्दांनी साधक तृप्त आणि समाधानी होत होते.
साधक बंधुभगिनींनी सद्गुरुस्मरण करीत अत्यंत प्रेमाने बनविलेल्या महाप्रसादाला अवर्णनीय गोडी आली होती. छोट्याशा विश्रांतीनंतर सर्व साधकमंडळी प्रवचन-श्रवणासाठी पुन्हा एकत्र जमली. प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी श्री ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील चारशे आठ क्रमांकाची ओवी सेवेकरिता घेतली होती.

प्रस्तुत ओवीचे विवरण करताना प.पू.श्री.अनिरुद्धदादा म्हणाले की, ‘‘श्रीभगवंतांनी अर्जुनाला उपदेश करत असताना हा सहावा अध्याय म्हणजे ‘अभ्यासयोग’ सांगितला आहे. या ओवीमधून सद्गुरु श्री माउली महात्म्यांची स्थिती तसेच साधनेची फलश्रुती सांगत आहेत. महात्मे लौकिक दृष्ट्या जरी देहात राहून व्यवहार करताना, सुखदुःख भोगताना दिसले, तरी आमचा (श्री माउलींचा अर्थात् श्रीभगवंतांचा) असा अनुभव आहे की ते महात्मे परब्रह्मस्वरूपच झालेले असतात !’’
‘श्रीयोगवासिष्ठा’त श्री वसिष्ठ महामुनींनी प्रभू श्रीरामांना केलेल्या उपदेशाचा संदर्भ देत ते म्हणाले की, ‘‘मनुष्याच्या चित्तावर असणाऱ्या जन्मोजन्मींच्या संस्कारांच्या परिणामाने प्रापंचिक वृत्ती तयार होत असतात. त्यामुळे सर्वप्रथम नियमित साधनेने चित्तशुद्धी होण्याची आवश्यकता असते. कर्माचे संस्कार हे प्रथम चित्तावर उमटतात, त्यांचे प्रतिबिंब मनात पडते आणि मन इंद्रियांच्या द्वारे कर्म करविते. त्यामुळे सुख-दुःखादी भावना मनाच्या सापेक्ष होत असतात. परमार्थमार्गावर चालताना साधकांपाशी ‘निश्चय’, ‘प्रयत्न’, ‘भाव’ आणि ‘भक्ती’ या चार प्रमुख गोष्टी असण्याची आवश्यकता असते !’’
भक्तीची व्याख्या करताना प.पू.श्री.अनिरुद्धदादांनी असे सांगितले की, ‘‘भक्ती म्हणजे देवांविषयी, सद्गुरूंविषयी कामनाविरहित निष्काम प्रेम. भाव आणि भक्ती यांच्या जोडीने निश्चयपूर्वक साधना करून प्रयत्न केल्यास साधक नियमितपणे निश्चितच परब्रह्मस्वरूप होऊ शकतो. साधकाने ‘योग’ आणि ‘बोध’ हे दोन्ही साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साधनेने योग साधावा आणि आपल्या सद्ग्रंथांचा अभ्यास करून बोधाचे अंग पक्के करावे. प.पू.सद्गुरु श्री. मामा आणि प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या चरित्रांतून हे स्पष्ट बघायला मिळते की बाह्यतः व्यवहारातील सर्व कर्मे दक्षतेने करीत असतानाही हे उभय महात्मे त्यात कधीच लिप्त झाले नाहीत. त्यामुळे ही ओवी त्या दोघांना तंतोतंत लागू पडते. असे सांगून सद्गुरु श्री. अनिरुद्धदादांनी झालेली प्रवचन-सेवा श्रीसद्गुरूंच्या चरणीं समर्पित केली.
चहापानानंतर सर्वांनी अत्यंत उत्साहाने ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र’, ‘श्रीदत्तभावांजली स्तोत्र’ आणि ‘श्रीहरिपाठ’ यांचे पठण केले. त्यायोगे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. त्यापाठोपाठ आरती आणि मंत्रपुष्पांजली संपन्न झाली.
दोन दिवसांचा हा भक्तिरसपूर्ण महोत्सव श्रीसद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने व मार्गदर्शनाने अत्यंत आनंदाने संपन्न झाला. या वेळी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांच्या हृदयात श्रीसद्गुरुप्रेमाचा एकच धागा अविरत कार्यरत असल्याची प्रचिती प्रकर्षाने येत होती. हेच प्रेमसंजीवन आम्हां सर्व साधकांना पुढील उत्सवापर्यंत नित्य साधना करण्याची प्रेरणा देणार आहे. महोत्सवाच्या या दोन दिवसांतील अनेक पावन स्मृतींना उजाळा देत आणि सद्गुरुप्रेमाने तुडुंब भरलेल्या हृदयाने सद्गुरूंना नमन करून आणि प्रेमाने परस्परांचा निरोप घेऊन साधकमंडळी स्वगृही परतली.
उत्सवातील काही क्षण चित्रे
